संकलन : चैतरामजी कोल्हारे सर ( शिक्षक जिल्हा परिषद शाळा, जिल्हा गोंदिया)
लोकशाही एक्सप्रेस न्यूज
‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.
भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहीला. महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरूपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते.
गुरूपौर्णिमेचे महत्त्व :
शाळा, कॉलेज, व्यवसायक्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. कारण ज्याच्या आयुष्यात गुरू असतो त्याला त्याच्या गुरूकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ मिळत असत.
गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असू शकतात. गुरूची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरूपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.